नाशिक जिल्हा आणि खान्देशात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. जिल्ह्यातील धरणं भरत आल्यानं गोदावरी नदीला पूर आलाय. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यानं गोदावरीच्या पातळीतही वाढ झालीय. या पार्श्वभुमीवर प्रशासन सतर्क झालं असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी (१४ सप्टेंबर) जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा तालुक्यात पावसाचा जोर वाढणार आहे. सोबतच खान्देशमध्येही पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी दोन दिवसांत विदर्भासह नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रशासन झाले सतर्क
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरण भरत आले असल्याने गोदावरीला केव्हाही पूर येऊ शकतो. हे लक्षात घेता रामकुंड परिसरातली दुकानं हलवण्यात आलीत. पूराच्या पाण्यात पोहण्यासाठी अनेक लहान-मोठ्या मुलांची दिवसभर गोदाकाठी गर्दी होती. दुर्घटना टाळण्यासाठी या मुलांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.