नाशिक – मान्सून महाराष्ट्राच्या वेशीबाहेर जावूनही नाशिक जिल्हयात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रात शनिवारीपासून पुढील चार दिवस जोरदार पाउस होण्याचा अंदाज आहे.
राज्यात बहुतांश भागातून पावसाने काढता पाय घेतला आहे. मात्र मध्य व दक्षिण भारतात तो आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हयाकडे यंदा सुरूवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकरयांसमोर संकट उभे राहिले. मात्र सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने सारी कसर भरून काढली. मनमाड, नांदगाव परिसरात दोनदा ढगफुटी सदृश्य अटीवृष्टी झाली. यंदा गोदावरीला चार वेळेस पूर आला. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली आहे. राज्यात यावर्षी ४ महिने ९ दिवस पाऊस कोसळला. दोन दिवस आधी महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने यावर्षी एक दिवस आधीच महाराष्ट्रात काढता पाय घेतला आहे. दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण शनिवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
येत्या ४८ तासांत ओडिशासह राज्यातील मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या दहा जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित १० जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.