मुंबईतील दोन जुळ्या आयटी इंजिनियर बहिणींनी एका मांडवात एका तरुणाबरोबर विवाह केल्याची घटना सोलापुरातील अकलूजमधून समोर आली. या जुळ्या बहिणींनी मरेपर्यंत एकत्र राहायचे असल्याने एकाच तरुणासोबत विवाह केल्याचा निर्णय घेतला होता. पिंकी आणि रिंकी असे या तरुणींची नावं आहेत. अतुल आवताडे या ट्रॅव्हल्स व्यवसाय असणाऱ्या तरुणाशी त्यांनी विवाह केला. मात्र या लग्नावर अनेकांनी आक्षेप घेतला. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अतुलवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अतुलवर अदखपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला आयोगानेही त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र न्यायालयाने पोलिसांना या दाम्पत्याची चौकशीची परवानगी नाकारली, त्यामुळे पोलीस तपासाचा मार्ग बंद झाला. राज्यात यावरून बरचं राजकारणही रंगलं. मात्र आता हा मुद्दा थेट लोकसभेत पोहोचला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी ही घटना हिंदू संस्कृतीला डाग असल्याचं त्यांनी लोकसभेत म्हटले आहे. लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करत नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील सोलापूरात एका घटनेने हिंदू संस्कृतीला डाग लावण्याचे काम केले आहे. देशात कलम 495 आणि 495 लागू असताना एका तरुणांने दोन तरुणींशी विवाह केला आहे, मात्र देशात यावर कायदा करण्याची गजर आहे. तसेच हा विवाह करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. यामुळे येणाऱ्या काळात संस्कृतीला धक्का बसणार आहे.
2 डिसेंबर 2022 रोजी माळशिरसमधील अकलूजमध्ये पिंकी रिंकी आणि अतुल आवताडे यांनी विवाह केला. पिंकी आणि रिंकी जुळ्या असल्याने त्यांना लहानपासून लग्न करत एकाच घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबियांनी देखील या विवाहास मान्यता दिली. यानंतर मुंबईत ट्रॅव्हसचा व्यवसाय करणाऱ्या अतुल आवताडेशी जुळ्या बहिणांचा विवाह पार पडला.