शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केली. त्यावरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्यात दम असता तर ते असं घरात बसले नसते, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.
एका जुन्या प्रकरणात सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझे आणि उद्धव ठाकरेंचे व्यक्तीगत काही वाद नाही. उद्धव ठाकरे यांनाच नवनीत राणा, रवी राणा आणि हनुमानाची अडचण आहे. ही त्यांची अडचण असल्याने तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे.
शिवसेनेत बंड करून जे आमदार बाहेर पडले आहेत. ते स्वत:च्या हिंमतीवर बाहेर पडले आहेत. संभाजी ब्रिगेडबाबत सर्वांच्या मनात आदर आहे. परंतु उद्धव ठाकरेंमध्ये दम नाहीये, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्यात दम असता तर घरी बसले नसते. अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.
आगामी निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड या नवीन सहकाऱ्याला घेऊन आपण खांद्याला खांदा लावून लढणार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसेच संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून टीकास्त्र सोडले जात आहेत.
हेही वाचा : नवी युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का?, चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना सवाल