अमरावती : गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमधील राजकारणातील दोन महत्त्वाच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा यांच्यामधील वाद पेटलेला आहे. नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर त्यांचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून आता अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ठाकूर राणा दाम्पत्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणार आहेत. (Navneet Rana statement will be challenged, Yashomati Thakur will file a claim for damages)
खासदार नवनीत राणा यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्यानंतर या प्रकारामुळे संतापलेल्या ठाकूर यांनी आता त्यांना चांगलेच सुनावले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ते नवरा-बायको म्हणजेच राणा कंपनीने आजवर अमरावती जिल्हा नासवण्याचे काम केले आहे. त्यांचे जिल्ह्यात कोणाशीच पटत नाही.
तसेच, मागे ते आमदार बच्चू कडूंबाबत बोलले, मग त्यांनी माफी मागितली. यांनी प्रत्येकावर आरोप केले. काल (ता. 13 सप्टेंबर) आमदार बळवतंराव वानखेडेंबाबत बोलले, मग भाजपा नेते प्रवीण पोटेंबाबत बोलले. मुळात हे राणा दाम्पत्य काय दुधाने धुतलेले आहेत का? हीच सगळ्यात घाणेरडी मंडळी आहे. त्यामुळे मी यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. कारण असे कोणीही काहीही सहन करणार नाही, असे यशोमती ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
रवी राणांकडून पैसे घेतल्याचा केला आरोप
खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर थेट आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये यशोमती ताईंना रवी राणांनी कडक नोटा दिल्या होत्या, चेक दिला असता तर, पुरावा असला असता. पण, कडक नोटा दिल्या आहे, हे लहान मुलांनाही माहिती आहे की याचे पुरावे नसतात. आणि इतके झोमायचे कारण काय याचा अर्थ जे खरे असते तेच झोमते असा आरोप नवनीत राणा यांनी कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर केला आहे.