अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मलिकांच्या अटकेचा परिणाम फक्त महाराष्ट्रात नाही तर सध्या निवडणुकीचे वारे वाहत असलेल्या उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही दिसून येत आहे. तसेच आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढला आहे. आज महाविकास आघाडी सरकार मलिकांच्या समर्थनार्थ तर मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे.
नवाब मलिकांवरील ईडीच्या कारवाईचा महाविकास आघाडी आज निषेध करणार आहे. आज सकाळी १० वाजता मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे. यावेळी तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थितीत राहणार आहेत.
दरम्यान मलिकांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ माजली आहे. काल, बुधवारी रात्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यापूर्वी शरद पवार यांच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते यांची बैठक झाली. या बैठकीत मलिकांच्या अटकेबाबत चर्चा झाली.
नवाब मलिकांना अटक झाली असली तरी अजून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे आता मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. राज्यसभरात आज भाजप मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. याबाबतची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्यासोबत फोनवरून बातचित केली आणि नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यास सांगितले आहे.
हेही वाचा – Nawab Malik ED custody : नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी, सत्र न्यायालयाचा आदेश