नवीन कृषी कायदा करायचा असेल तर चर्चेच्या माध्यमातून करता येतो. केंद्रसरकारने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे मागे घेऊन तात्काळ शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. एखादा विषय प्रलंबित ठेवणं किंवा शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रसरकारला फटकारले आहे. केंद्राच्या तीन जाचक कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण आहेत. आज शेतकरी काळा दिवस साजरा करत आहेत. या आंदोलनाला राष्ट्रवादीसह १४ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लोकांनी काळी फित लावून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवावा असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.
केंद्रसरकारने जे कृषी कायदे केले आहेत त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे केंद्रसरकारची जबाबदारी आहे की, जर लोकं याच्या विरोधात सहा महिने आंदोलन करत आहेत. कोरोना काळात हे आंदोलन मंदावले असले तरी केंद्राला शेतकरी विरोधात आहेत हे कळलं पाहिजे आणि केंद्रसरकारने कायदे मागे घेतले पाहिजेत अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
बनावटगिरी करुन संभ्रम निर्माण करण्याचे काम
भाजपने तयार केलेल्या बनावट ‘टूलकीट’ वर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बनावटगिरी करुन… मिडियाला मॅनेज करुन… लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करतेय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप मिडिया हाऊस निर्माण करतेय तो त्यांचा अधिकार आहे. परंतु दोन्ही टूलकीट खरे आहे याचा भाजपने समोर येऊन खुलासा केला पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
देशभर बनावट लेटरहेड वापरुन टूलकीट तयार करण्यात आलेले आहे हे लोकं सांगत आहेत त्यामुळे भाजपचा फर्जीवाडा समोर आल्याचेही नवाब मलिक म्हणाले. भाजपने जो फर्जीवाडा करुन देशभर घृणा निर्माण करण्यासाठी बनावट लेटरहेडचा वापर केला. त्यावर ट्वीटर इंडियाने मॅन्यूप्लेटेड इंडियाचा टॅग लावला आहे. भाजपकडे याबाबतचे खरी कागदपत्रे असतील तर दुरुस्त करून घ्यायला हवी होती परंतु उलट ट्वीटरवर सवाल भाजप उठवत आहे. खरे कागद असतील तर ते दाखवा नाहीतर होणार्या कारवाईला सामोरे जा असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.