कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने सुरूवातीला ८ ते १० जणांना ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. पण प्रत्यक्षात याठिकाणी ११ जण होते. त्यापैकी तिघांना सोडल्यामुळे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी एनसीबीला प्रश्न केले आहेत. भाजपच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी फोन केल्यानेच तिघांना सोडण्यात आले. फक्त खोटी छापेमारी करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान एनसीबीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच बॉलिवुडला आणि महाराष्ट्र बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तिघांना सोडण्यात आलेल्यांपैकी एक रिषभ सचदेवा हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिलेल्या मोहित भारतीयचे मेव्हणे आहेत. त्यामुळेच या प्रकरणात एनसीबीची वापर करून भाजप बदनाम करण्याचे कारस्थान करत असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
रिषभ सचदेवाला सोडले तेव्हा त्याचे वडिल आणि काका दोघेही त्याठिकाणी उपस्थित होते असाही दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्या भाजप नेत्यांनी दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून फोन केले याचा खुलासा एनसीबीने करावा अशीही मागणी त्यांनी केली. या संपुर्ण प्रकरणात एनसीबीचे समीर वानखेडे यांच्याही कॉल रेकॉर्डची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रिषभ सचदेवाचे मित्र असल्यानेच आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभा सोडण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.