कोरोना काळात संपूर्ण चित्रपटसृष्टी मालदिव आणि दुबईमध्ये होती. त्याकाळात अभिनेते आणि अभिनेत्रींनवर दहशत माजवून अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) त्यांच्याकडून वसुली केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केला.
दुबई आणि मालदिवमधून वसुली होत असताना एनसीबीचे क्षेत्रीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा दावाही मलिक यांनी केला. यावेळी मलिक यांनी मालदीवची छायाचित्रे उघड केली.
वसुलीवेळी समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? असे सवाल करताना मलिक यांनी या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी केली.
अभिनेता सूशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली. त्यानंतर लगेच रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री आणिअभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले. त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचे काम झाले, असा आरोपही मलिक यांनी केला.
Here are the proofs! pic.twitter.com/ouq3nUXcs7
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 21, 2021
मलिकांच्या आरोपांना मनसेचं प्रत्युत्तर
नवाब मलिक यांच्या आरोपांना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाभ्रष्ट विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी आमच्या चित्रपट सेनेत काम करणाऱ्या जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केला होता. जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा आम्हाला अभिमान आहे. एनसीबीने तुमच्या जावयावर कारवाई केली त्याचा राग तुम्ही अशाप्रकारे काढणार का? असा सवाल खोपकर यांनी केलाय. आमच्या पदाधिकाऱ्यावर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. नवाब मलिकांकडे त्यांच्या विरोधात काय पूरावे आहेत, हे त्यांनी दाखवून द्यावं, असं देखील खोपकर म्हणाले.