राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विरोधात बोलणारे देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता. फडणवीस आताही बोलत राहिले तर पवारसाहेब त्यांना काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना साडेतीन जिल्हयाचा पक्ष म्हणून हिणवले होते. या टीकेला नवाब मलिक यांनी आज उत्तर दिले. पवारसाहेब मुख्यमंत्री असताना फडणवीस कधीही विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात त्यांच्या पक्षाच्या २५ ते ३० जागा निवडून येत होत्या. तेच आता पवारसाहेबांवर बोलत आहेत. याअगोदरही पवारसाहेबांवर फडणवीस यांनी टीका केली होती. त्यावेळी काय झाले होते, याकडे मलिक यांनी लक्ष वेधले आहे.
गोव्यातील आघाडीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची बैठक होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड गोव्यात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेसोबत जी अंतिम चर्चा होईल त्याचा निर्णय गोव्यात प्रफुल पटेल जाहीर करतील. उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली आहे. मणीपूरमध्ये कॉंग्रेससोबत आघाडी आहे. गोव्यात स्थानिक पातळीवर कॉंग्रेसने आघाडी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे, असेही मलिक म्हणाले.
हेही वाचा : नानाभाऊ केवळ शारीरिक उंची नव्हे, तर वैचारिक-बौद्धिक उंचीही असावी, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार