ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत आज नवाब मलिकांना दणका बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री यांनी आज हायकोर्टात बिनशर्थ माफी मागितली. नवाब मलिक यांनी याआधी प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी हमी देऊनही अनावधानाने वानखेडेंबद्दल वक्तव्य केल्याने दिलगिरी व्यक्त केली. यापुढे अशी चूक होणार नाही, असेही नवाब मलिक यांनी कबुल केले. नवाब मलिक यांचा माफीनामा हायकोर्टाने स्विकारला आहे.
Nawab Malik Apologizes To Bombay High Court For Violating Undertaking To Not Make Statements Against Sameer Wankhede Family @CourtUnquote https://t.co/GiQNeczWSk
— Live Law (@LiveLawIndia) December 10, 2021
याआधी मंगळवारी झालेल्या सुनावणीत नवाब मलिक यांनी ज्ञानदेव वानखेडे, वानखेडे कुटूंबीय आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात वक्तव्य न करण्याचे आश्वासन प्रतिज्ञापत्रात दिले होते. पण प्रतिज्ञापत्रात नमुद केलेल्या बाबीचे उल्लंघन केल्याची प्रथमदर्शनी नोंद उच्च न्यायालयाने केली होती.
आज शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने नवाब मलिकांना विचारले की याआधी तुम्ही प्रतिज्ञापत्रात वानखेडे कुटुंबीयांविरोधात वक्तव्य करणार नाही, असे म्हटले होते. त्या गोष्टीचे उल्लंघन केल्यासाठी कारवाई का करू नये ? याबाबतचा स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
याआधी मंगळवारी झालेल्या सुनावणीत ज्ञानदेव वानखेडे यांचे वकील विरेंद्र सराफ यांनी कोर्टाला सांगितले की प्रतिज्ञापत्र देऊनही वानखेडेंविरोधात २५ नोव्हेंबरला मुलाखतीत त्यांनी वक्तव्य केल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. याआधीच न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचे म्हणणे एकून हे प्रकरण जैसे थे ठेवले होते. त्यामध्ये नवाब मलिक यांनी वानखेडे कुटूंबीयांविरोधात सार्वजनिकरीत्या कोणतीही टिप्पणी करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळेच हा मानहानीचा दावा काही काळ थांबला होता. पण प्रतिज्ञापत्र देऊनही नवाब मलिक यांनी वानखेडे कुटूंबीयांवर बोलले. त्यामुळेच वानखेडेंच्या वकिलांनी कोर्टाला विचारले की हा एखादा विनोद सुरू आहे का ? प्रतिज्ञापत्र देऊनही नवाब मलिक वानखेडे कुटूंबीयांविरोधात बोलत होते. याबाबतची माहिती वानखेडेंकडून कोर्टाकडे मांडण्यात आली. २९ नोव्हेंबरला कोर्टाचा आदेश आल्यानंतरही नवाब मलिक बोलतच राहिल्याचे वकिलांनी कोर्टाला सांगितले.
या प्रकरणातील न्यायमूर्ती जाधव यांनी हे अतिशय गंभीर असल्याचे मत नोंदवले. नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी सव्वा कोटींचा मानहानीचा दावा केला होता. याआधी ज्ञानदेव वानखेडेंविरोधात मलिकांना कोणतेही विधान करण्यापासून मज्जाव करणारा आदेश एक सदस्यीय खंडपिठाने दिला होता. याच आदेशाविरोधात ज्ञानदेव वानखेडे हायकोर्टात गेले होते.
नवाब मलिक यांनी याआधी अनेकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्म प्रमाणपत्र तसेच विवाहाच्या निमित्ताने टिप्पणी केली होती. तसेच सोशल मिडियावरही वैयक्तिक पुरावे मांडले होते. त्याचप्रमाणे नवाब मलिक यांनी ज्ञानदेव वानखेडे यांच्या धर्माबाबतची आणि लग्नाबाबतची माहिती सार्वजनिकरीत्या सोशल मिडियावर मांडली होती. त्यामुळेच ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. एक सदस्यीय खंडपिठाने नवाब मलिकांना बोलण्यापासून मज्जाव करण्यासाठी नकार दिल्याच्या आदेशाला ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.