मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मराठी भाषिकांनी बेळगावमध्ये आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले. दरम्यान, बेळगावमधील मराठी भाषिकांची महामेळाव्यापूर्वी धरपकड करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने यात लक्ष घालावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाने जशास तसे उत्तर देऊ असे आव्हान दिले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रातील राजकीय पक्ष नेहमीच आवाज उठवत आले आहेत. याचीच आठवण भुजबळांनी त्यांच्या पोस्टद्वारे सांगितली आहे. भुजबळ शिवसेनेत (एकिकृत) असताना बाळासाहेब ठाकरे यांनी 1986 मध्ये मराठी अस्मितेसाठी रणशिंग फुंकले. त्यांच्या आदेशानुसार शिवसैनिक बेळगावात घुसले. मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. असे भुजबळांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ
1986 साली कर्नाटक सरकारने बेळगावसह संपूर्ण सीमाभागात कन्नड भाषा सक्तीने लादली. मराठी भाषेचा आणि अस्मितेचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्रातील मराठी बांधवांना असह्य झाला. याच अन्यायाविरुद्ध शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला आणि मराठी अस्मितेसाठी रणशिंग फुंकले. त्यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसैनिक बेळगावच्या भूमीत वेशभूषा करून प्रवेश केला, मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला.
त्या काळात कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून बेळगावात जाणारे सर्व मार्ग बंद केले होते. पण मराठी अस्मितेसाठी लढण्याची आमची जिद्द अडथळ्यांना भीक घालणारी नव्हती. आम्ही गोवा मार्गे बेळगावात दाखल झालो आणि आंदोलनाला बळ दिले. कर्नाटक सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली होती.
आजही सीमावादाचा प्रश्न तसाच आहे, मराठी बांधव आजही आपल्या हक्कांसाठी झगडत आहेत. या मराठी बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे! 1986 च्या त्या ऐतिहासिक आंदोलनाची क्षणचित्रे आजही मराठी अस्मितेच्या संघर्षाची साक्ष देतात
हेही वाचा : Sanjay Raut : हा तर मोदी सरकारचा ढोंगीपणा, बांगलादेशातील हिंदू अत्याचारावरून राऊतांची टीका
Edited by – Unmesh Khandale