एकीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल अवघ्या काही दिवसांतच स्पष्ट होणार असून, दुसरीकडे राज्याच्या राजकारणात पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ncp Ajit Pawar scheduled program in Pune cancelled and 2 prominent BJP leaders to Delhi)
अजित पवार यांचा पुण्यातील पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कारण नागपूरात रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर अजित पवार रात्री उशिरा नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात श्रीसेवकांची विचारपूस करण्यासाठी पोहचले. त्याठिकाणाहून अजितदादा पुण्याला न जाता थेट मुंबईतील त्यांच्या देवगिरी बंगल्यावर गेले.
एकीकडे अजित पवारांचा पुणे दौरा रद्द झाला आहे तर, दुसरीकडे भाजपाचे दोन प्रमुख नेते दिल्लीला गेले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, अमित शाह २ दिवसीय मुंबई दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते अचानक दिल्लीला का गेले असा सवाल उपस्थित केला जात आहे.
‘असा’ होता अजित पवारांचा पुणे दौरा
- सकाळी ९.३० वाजता – वडकी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन
- सकाळी ९.४५ वाजता – दिवे येथून मोटार सायकल रॅली
- सकाळी १०.१५ वाजता – मौजे वनपुरी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्धाटन
- सकाळी १०.४५ वाजता – मौजे भिवरी, जिल्हा परिषद पुणे साठवण बंधारा भूमिपूजन
- पुणे – सासवड रस्ता ते पुणे सातारा हायवे जोड रस्त्याचे पूजन
- हॉटेल आमराई ६९ रिसोर्ट उद्धाटन
- हॉटेल सुभेदार वाडा उद्धाटन
- सकाळी ११.२० वाजता – वाघिरे महाविद्यालयात राखीव वेळ
- सकाळी ११.३० वाजता – शेतकरी आणि युवक मेळावा, सासवड
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांपैकी विरोधी पक्षनेते अजित पवार हे वेळेचे बंधन पाळणारे नेते आहेत. अनेक राजकीय कार्यक्रमात अजित पवार वेळेच्या पूर्वीच हजर होतात. मात्र, अजित पवारांनी पुणे दौरा रद्द केल्याने अनेक चर्चा होत आहे.
मागच्या वेळीही अजित पवार यांचा पुणे दौरा रद्द झाला, ते नॉट रिचेबल झाले तेव्हा प्रकृतीच्या कारणास्तव ते बाहेर आले नाहीत असे सांगण्यात आले होते. परंतु, आज नियोजित कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – उष्माघात झालेल्या ११ जणांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू, मृतांचा आकडा १३ वर