‘माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात महाराष्ट्र ओरबाडून काढला आहे. तसेच फडणवीस सरकारने हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. मी याचे पुरावे देऊ शकतो. मी पुराव्याशिवाय किंवा कोणत्याही कागदपत्राशिवाय कधीच बोलत नाही. फडणवीस यांनी शिवस्मारकाच्या कामातही इतका घोळ केला आहे की, उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारले पाहिजे. फडणवीस सरकारने शिवाजी महाराजांनाही सोडले नाही’, असे वादग्रस्त आणि गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी केले आहेत.
धुळे शहरातील भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी डिसेंबर महिन्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी गोटे यांनी भाजप पक्षात राहून भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीत आल्यानंतरही अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका सातत्याने सुरु ठेवली आहे.
प्रत्येक गावातील घोटाळ्याची माझ्याकडे यादी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक गावात घोटाळा केला आहे. या प्रत्येक घोटाळ्याची माझ्याकडे यादी आहे. तसेच फडणवीस यांच्या खोटारडेपणाला कंटाळून मी राजीनामा दिला असून त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असा गंभीर आरोप देखील अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
फडणवीस गुंडांचे साथीदार
‘मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केले. पण, ते गुंड आणि बदमाशांचे साथीदार आहेत हे लक्षात आले. पक्ष सामान्य माणसांचा असतो. तसेच आता सगळी राजघराणी आमच्या पक्षात आली, असे देखील ते पुढे म्हणाले होते. राजघराण्यांसाठी पक्ष चालवता का? शेवटचा गरीब माणूस आपल्या पक्षात राहील, असे मी म्हटले असते. पण यांना राजघराण्याची पडली आहे,’ अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे.’
हेही वाचा – एका लग्नासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी बदलला कार्यक्रम!