सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुरते ढवळून निघाले असून मुंबई होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर तर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची खेळी सुरू झाली असून “हे भाजपचेच षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केल्याने या प्रकरणातील गूढ अजूनच वाढलं आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणामुळे अडचणीत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनीच सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींची खंडणी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते. असा खळबळजनक आरोप सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात केला. पण परमबीर सिंह यांनी हे पत्र फडणवीस यांच्या शहा मोदी भेटीनंतरच का लिहले. असा प्रश्न मुश्रीफ यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केला . तसेच हे भाजपचेच षडयंत्र असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर सिंग यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात येत असून हे एक नियोजित कटकारस्थान आहे. यामुळे याप्रकरणाची चौकशी झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये असे सांगत मुश्रीफ यांनी सिंग यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.