भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ज्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराजांबाबतही भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहेत. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजप नेत्यावर निशाणा साधला आहे. शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबा ची पत्र लिहून माफी मागितली होती असा म्हणणारा ठार वेडाच असू शकतो … बोलणारा #भाजप प्रवक्ता असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबा ची पत्र लिहून माफी मागितली होती असा म्हणणारा ठार वेडाच असू शकतो … बोलणारा #भाजप प्रवक्ता pic.twitter.com/QzkPtsVdrK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2022
दरम्यान छत्रपती शिवरायांबाबत सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण अधिक तापतेय. छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. असा असताना भाजप नेत्यांकडून सातत्याने त्यांच्याविषयी वादग्रस्त विधानं केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीने राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी चर्चेत भाजपचा प्रवक्ता म्हणून सुधांशू त्रिवेदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील औरंगजेबची माफी मागितल्याचा दावा केला आहे. यावेळी राहुल गांधींना घेरण्याऐवजी भाजपवरचं रोष व्यक्त केला जात आहे.