ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत होत्या. मात्र आज अखेर शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. या युतीबाबत आता विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील महाराष्ट्रात बाळासाहेबांची मोठी ताकद आहे, त्याचा ठाकरे गट-वंचित युतीला नक्कीच फायदा म्हणत ठाकरे गट- वंचितच्या युतीचं स्वागत केलं आहे.
यावेळी वंचित- ठाकरे गट युतीवर बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची युती आहेच, आता प्रकाश आंबेडकर यांची देखील शिवसेनेसोबत युती झाली आहे, त्याच मी आवश्य आम्ही स्वागत करतो. कारण बाळासाहेबांची मोठी ताकद महाराष्ट्रात आहे त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. राष्ट्रवादीकडून मी नक्कीच याचा स्वागत करेन, अस देशमुख म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दादरमधील स्मृतीस्थळी आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ ऊर्जा स्त्रोत आहे. त्यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला अभिवादन करतो, असं अनिल देशमुख म्हणाले.
दरम्यान ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केल्यानंतर पुढील वाटचालीबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. “वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही एकत्र येण्याचे ठरवले आहे. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल. आणखी पुढे काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल. आज जे काही देशात चालू आहे ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.