राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. भादंवि 153, 501, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याणमधील बाजारपेठ आणि कोसळेवाडी, डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणाबाबत आनंद परांजपेंना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे, याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली.
मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणाबाबत आनंद परांजपेंना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी 18 जानेवारीपर्यंत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना काळजी घ्यायला हवी, यात सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातोय.अशा पोलीस अधिकाऱ्यांना आर्थिक दंड लावून ती रक्कम त्यांच्या पगारातून वगळायला हवी, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा
18 जानेवारीपर्यंत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
पोलीसांनी गुन्हा दाखल करताना काळजी घ्यायला हवी, यात सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातोय
अश्या पोलीस अधिका-यांना आर्थिक दंड लावून ती रक्कम त्यांच्या पगारातून वगळायला हवी— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 13, 2023
माझ्यावर महिन्याभरापूर्वी 354 अंतर्गत मुंब्रा येथे दाखल झालेला गुन्हा व वर्तकनगर येथे दाखल झालेला गुन्हा, दोन्ही गुन्ह्यांमध्ये जामीन देताना न्यायालयाने आक्षेप नोंदवले होते. गुन्हा घडलेलाच दिसत नाही आणि नोंदवले गेले आहेत. पोलिसांना एवढी का घाई झाली आहे हेच कळत नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्दाचा वापर करत ट्वीट केलं होतं. या ट्वीटनंतर बाळासाहेबांची शिवसेनेनं आनंद परांजपे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. या घटनेच्या निषेधार्थ परांजपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख महेश गायकवाड, शहर प्रमुख रवी पाटील, महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यात परांजपे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आली होती. त्यानुसार त्यांच्याविरोधात भांदवि 153, 501, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आनंद परांजपे नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री, ज्याला तुम्ही चाणक्य समजत आहात, तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत ठरणार आहे, असं वक्तव्य आनंद परांजपे यांनी केलं होतं. तसेच ही आमची वैचारिक लढाई आहे. आमच्यावर ज्यांनी गुन्हे दाखल केले ते खरे गुन्हेगार आहेत. आंदोलन करताना आम्ही काही घोषणा दिल्या. त्या असंसदीय नव्हत्या आणि कोणाची बदनामी त्यातून केली नाही, असं आनंद परांजपे म्हणाले होते.
हेही वाचा : माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल