राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतचं मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले. यावेळी तब्बल दोन वर्षानंतर गणरायाचे दर्शन घेत आनंद आणि सुख मिळत असत असून कदाचित डॉक्टरच्या रुपाने बाप्पा आल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवरही टीकेचे बाण सोडले. शिंदे फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंडबाजी ईडीचे सरकार असल्याची खोचक टीका त्यांनी केली.
सुप्रिया सुळे यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, दोन वर्षांच्या कोव्हिड काळात गणपती बाप्पा सर्वांच्या मनात विराजमान होते. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नाही तरी प्रत्येकाने मनातून, आपल्या परीने घरी बाप्पाचे स्वागत केले. दोन वर्षांच्या कठीण काळात डॉक्टर, यंत्रणा आणि प्रशासनाच्या मदतीने आपण कोरोनावर मात करु शकलो. त्यामुळे दोन वर्षांनतर कदाचित डॉक्टरांच्या रुपात यंदा बाप्पा आलेत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
यावेळी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 50 खोके ऑल ओके वाल्या सरकारला सर्वसामान्यांची सेवा करण्याची इच्छा नव्हती. सध्या सरकारमधील लोक कार्यक्रमांना भेटी देणं सोडतील तर जनतेची सेवा करतील ना… हे एवढे सेलिब्रेशन करण्यात एवढे व्यस्त आहेत की बस्ता बांधला त्यानंतर लग्न केले. मात्र लग्नाचा अजूनही हनिमून सुरु आहे. तसेच 50 खोके ऑल ओके, सर्वसामान्य माणूस मात्र नॉट ओके, असही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मूळ मुद्याला बगल देण्याची भाजपची ही जुनी खेळी असल्याचा आरोप सुळेंनी केला आहे. दरम्यान महाआघाडीने सरकार पाडण्यासाठी घाई केली मात्र सरकार आमचे सरकार पाडण्यासाठी इतर राज्यांची मदत घ्यावी लागते ही शोकांतिका आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर एक महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. हे मायबाप सरकार आहे आलिया भोगासी असेच या सरकारबद्दल म्हणावे लागेल, अशी बोचरी टीकाही सुप्रिया सुळेंनी केली आहे.