मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण चिघळले आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे.
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे सामाजिक समीकरण बिघडत असून त्यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी किंवा समज द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे.
भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे व राज्यसरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे परंतु दुर्दैवाने राज्याचे राज्यपाल नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
राज्यपाल अशी वादग्रस्त विधान करत असल्याने सामाजिक समीकरण बिघडत आहेच शिवाय ते जनतेचा रोष ओढावून घेत आहे. मात्र राज्यपालांनी तसे करु नये असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे. दरम्यान राज्यपालांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी अशी विनंती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या पत्रात महेश तपासे यांनी केली आहे.