पुणे – राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेवर निघाले आहेत. लाडकी बहीण योजना ही कायम सुरु ठेवणार असे आश्वासन ते देत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून सुरु करण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यामातून विरोधकांनी लाडकी खुर्ची वाचवण्यासाठीही ही योजना असल्याची टीका केली आहे. ‘बारामतीच्या जनतेने दाखवून दिले आहे की लाडकी बायको नसते तर लाडकी बहीणंच असते’, असा टोला शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी लगावला आहे.
41 आमदार नाही तर आलीबाबा चाळीस चोरांची टोळी
महेबूब शेख म्हणाले की, जयंत पाटील यांच्याकडे चकरा मारणाऱ्यांना आता एकच सांगा की विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला की तो परत येत नाही. त्यामुळे जे लोकसभेच्या आधी परत आले ते आपले आणि आता उरलेले ४१ आमदार नाहीत तर ते आलीबाबा आणि चाळीस चोर आहेत. या आलीबाबाच्या टोळीला परत घेऊ नका. आज नागपंचमीचा सण आहे, आज सापांना दूध पाजलं जातं. मात्र पवार साहेबांनी ज्या सापांना 20-20 वर्षे दूध पाजले त्या सापांनी आता पवारांवर फणा काढला आहे, अशी टीका महेबूब शेख यांनी केली.
हेही वाचा : NCP Vs NCP : लाडकी बहीणसाठी राज्यातील सर्व योजना बंद; शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेतून टीका
लाडकी खुर्ची योजना
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, लाडकी बहीण नाही, लाडका भाऊ नाही, लाडकी मोलकरीण नाही आता एकच योजना आहे लाडक खुर्ची. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना नाही तर लाडकी खुर्ची योजना आहे. खुर्चीसाठी वाट्टेल तसे लोटांगण घालण्याची तयारी महायुतीने केली आहे. त्यासाठी दिल्लीचे दौरे सुरु झाले आहेत. त्यामुळे आपलं स्वाभिमान जागवणारे सरकार आपल्याला राज्यात आणायचे आहे. त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा निघाली असल्याचे म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, गुलाबी रंगाची पूंगी वाजवून योजनेच्या नावांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का, हे पाहिले जात आहे. राजकीय नागपंचमीतील हा फरक समजून घ्या, असेही अमोल कोल्हे म्हणाले.
Edited by – Unmesh Khandale