घरमहाराष्ट्र"राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरू" काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट; तर संजय राऊत म्हणतात...

“राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरू” काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट; तर संजय राऊत म्हणतात…

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

महाविकास आघाडीची मुंबईत सोमवारी (ता. 01 मे) ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या सभेला लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या सभेमुळे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या नाराजी नाट्यावर जरी पडदा पडलेला असला तरी, काँग्रेसच्या एका नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या खुलाश्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी कर्नाटक विधानसभेत निपाणी मतदारसंघात प्रचारादरम्यान हा गौप्यस्फोट केला आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांची निवृत्तीची घोषणा; कार्यकर्ते भावूक

- Advertisement -

कर्नाटकात पुढील आठवड्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते कर्नाटकात प्रचारासाठी हजेरी लावत आहेत. यावेळी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निपाणी मतदारसंघात भाषण केले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसने इकडे उमेदवार उभा केला आहे. तिकडे ते आमच्यासोबत आहेत, किती दिवस असतील माहिती नाही. कारण भाजपसोबत त्यांची रोज बोलणी चालली आहेत. रोज पेपरमध्ये बातमी येते, कोण नेता जाणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा त्यांनी घ्यावा’, असे सांगत चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
‘राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असतो तो रद्द झाला आहे. त्यांना इतर राज्यांमध्ये मतं मिळाली नाहीत, म्हणून निवडणूक आयोगाने त्यांचा दर्जा काढून टाकला आहे. इतर राज्यांमध्ये जाऊन मतांची टक्केवारी वाढली तर पुन्हा आपल्याला कदाचित राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल म्हणून टक्केवारीसाठी निवडणूक आहे. भाजपची टक्केवारीची निवडणूक वेगळी आहे, राष्ट्रवादीची वेगळी आहे.’ असे म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता पृथ्वीराज चव्हाण यांनीच अशा प्रकारचा खळबळजनक दावा केल्याने यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये कोणता बिघाड होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीमधील आम्ही सगळे एकत्र : संजय राऊत
पृथ्वीराज चव्हाणांच्या या गौप्यस्फोटाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “याबाबत मला काही माहित नाही. मला इतकंच माहित आहे की आम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत. काल आपण आमची एकी आणि वज्रमूठ पाहिलेली आहे. कालच्या व्यासपीठावर अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले असे प्रमुख नेते एकत्र होते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -