रायगड : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. त्यामुळे या चिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार करून ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. यासाठी आज (ता. 24 फेब्रुवारी) रायगडावर ‘तुतारी’ या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. ‘तुतारी’ चिन्हाच्या अनावरणासाठी किल्ले रायगडावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. (NCP Unveiling of ‘Tutari’ symbol by Sharad Pawar at Fort Raigad)
हेही वाचा… Sanjay Raut : ‘हातात मशाल’ घेऊन सर्वांची ‘तुतारी’ वाजवू, राऊतांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
किल्ले रायगडावर आज फुलांची सजावट करण्यात आली होती. तर विशेष अशा कार्यक्रमाचे आयोजन करत शरद पवारांनी तुतारीचे अनावरण केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार फौजिया खान, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राजेश टोपे आणि अन्य नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. तुतारी चिन्हाच्या अनावरणानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर तुतारी हे चिन्ह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.
किल्ले रायगडावर शरद पवार म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले. परंतु, रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलो आहोत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया, असे शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले.