राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट राज्यातील तब्ब्ल १६ हजार पूरग्रस्त कुटुंबाना मदत करणार आहे. तसंच, पूरग्रस्त भागांत २५० डॉक्टरांचं पथक पाठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी आज राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे लोकांचं झालेलं नुकसान या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
सहा ते सात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुराने काय परिस्थिती निर्माण झाली हे सांगायची आवश्यकता नाही. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अमरावतीचा थोडा भाग या ठिकाणी घरांचं नुकसान आणि अन्य प्रकराचं नुकसान झालं आहे. राज्यांच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं. सात जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यांमध्ये देखील नुकसान झालं आहे. विशेषत: शेतीचं झालं आहे. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचं नुकसान झालं आहे. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. माती वाहून गेली आहे. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे. राज्य सरकार त्यांच्या कार्यक्रमानुसार मदत करेल. काही तातडीची मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे. आढाव्यानंतर राज्य सरकार आणखी मदत जाहीर करेल अशी खात्री आहे, असं शरद पवार म्हणाले.
१६ हजार किटचं वाटप करणार
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून १६ हजार किटचं वाटप करणार असल्याचं सांगितलं. या किटमध्ये घरगुती भांडी, दोन प्लेट, दोन पेले, दोन वाट्या, दोन शिजवायची भांडी, एक तवा, एक चमचा, पोळपाट लाटणे या वस्चू असणार आहेत.
२५० डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात जाणार
कोरोनाचा संकट सुरु आहे, त्यामुळे मास्कचही वाटप केले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा वैद्यकीय विभाग आहे, त्यांची २५० डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात जाऊन तपासणी करतील, औषधं देतील. गंभीर आजारी रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार केले जातील. अडीच कोटीच्या आसपास याची किंमत आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.