एकिकडे राज्यभरात पावसामुळे साथीच्या आजारांनी डोकं वर काढले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच आज राज्यात 2 हजार 186 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच, दिवसभरात 2 हजार 179 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. (New 2186 corona patients in maharashtra)
राज्यात नोंद झालेल्या कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत रविवारी सर्वाधिक म्हणजे 276 रुग्णांची भर पडली आहे. राज्यात तीन कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78 लाख 55 हजार 840 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.96 टक्के इतके झाले आहे.
15 हजार 525 सक्रिय रुग्ण
राज्यात रविवारी एकूण 15 हजार 525 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2 हजार 300 इतके रुग्ण आहेत. तसेच, ठाण्यामध्ये 1 हजार 270 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात 20 हजारांहून कोरोना रुग्ण
देशातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसत आहे. देशात सलग चौथ्या दिवशी 20 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 20 हजार 528 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
बी ए. 5, बी ए. 4 व्हेरीयंटचे 17 रुग्ण आणि बी ए. 2.75चे 17 रुग्ण
राज्यात बीए 5 व्हेरीयंट आणि बीए 4 व्हेरीयंटचे 17 रुग्ण आढळले आहेत. तर बी ए. 2.75 चे 17 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी दिवसभरात 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 25 हजार 709 वर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात 17 हजार 790 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.
हेही वाचा – शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी