मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हायकोर्टात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी करण्यात आली. त्यांची याचिका मान्य करुन परमबीर सिंह यांच्या आरोपांवर सीबीआय चौकशी करण्याचा हायकोर्टाने आदेश दिला आहे. यानंतर हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर नैतिकदृष्ट्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री पदाची धुरा आता शरद पवार यांचे जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे. यानुसार आता राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील. सध्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री पद आहे.
राष्ट्रवादीचे नेते दिलीप-वळसे पाटील यांच्याकडे असलेले कामगार व उत्पादन मंत्रीपद उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे राहणार आहे. राज्यात विधानसभा निवडणूकांनंतर दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाची धुरा सांभाळावी अशी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटत होते. दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे पीए होते. दिलीप वळसे-पाटील हे शांत स्वभावाचे नेते असून गृहमंत्री पद त्यांना देण्यात यावे असे पक्षातील नेत्यांनाही वाटत होते. विधानसभा निवडणूकीच्यानंतर खातेवाटप करताना दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपदाची धुरा नको असल्याचे म्हटले होते. दिलीप वळसे पाटील यांचे म्हणणे असे होते की, माझी प्रकृती ठीक नाही आहे आणि मी हे पद घेऊ शकत नाही त्यामुळे वळसे-पाटीलांना दुसरे खाते देण्यात आले होते.
दिलीप वळसे पाटील उद्या गृहमंत्री झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही कारण २०१९ मध्ये महाविकास आघाडीमध्ये खाते वाटप होत असताना दिलीप वळसे पाटलांना गृहमंत्री पद देण्याचे ठरले होते. परंतु वळसे-पाटलांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी नाकारले होते. वळसे पाटील शांत स्वभावाचे आणि जास्त न बोलणारे नेते असल्यामुळे गृहमंत्रीपदासाठी योग्य असल्याचे काही नेत्यांचे मत आहे. तसेच शरद पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू असल्यामुळे वळसे-पाटील यांना गृहमंत्रीपद द्यावे असे शरद पवार यांनाही वाटते.