मुंबईः महिलांना संकट काळात तातडीने मदत मिळावी म्हणून महिला व बाल विकास विभागाने ‘१८१’ हा नवा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक आणला आहे. २४ तास हा क्रमांक फक्त महिलांसाठी कार्यरत असेल. हुंडाबळी, बालविवाह यासह कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी महिलांना या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
महिला अत्याचाराची तक्रार आल्यावर त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. शासनाच्या विविध योजनांची माहितीही या क्रमांकावरून महिलांना मिळवता येईल. पंतप्रधानांच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेअंतर्गत हा क्रमांक सुरू करण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात तो महिलांसाठी कार्यरत होईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी दिली.
महिला व मुलींना संरक्षण देण्यासाठी शिंदे-फडणवीस नवनवीन नियम करत आहे. त्याअंतर्गतच आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांची नोंद ठेवणारी समिती राज्य सरकारने गेल्या वर्षी स्थापन केली. १३ सदस्यांची ही समिती असून महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा या समितीचे अध्यक्ष आहेत. नोंदणीकृत व अनोंदणीकृत विवाह व धार्मिक स्थळी झालेले विवाह. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह. पळून केलेले विवाह यांची माहिती घेण्याचे काम ही समिती करणार आहे. तसेच ही जोडपी कुटुंबियांच्या संपर्कात आहेत का याची माहिती घेणे व हे जोडपे संपर्कात नसल्यास त्यांच्याकडून कुटुंबियांची माहिती घेणे. कुटुंबियांचा विवाहाला विरोध असल्यास त्यांचे समपूदेशन करणे. त्यांच्यातील वाद मिटवणे ईत्यादी कामे ही समिती करणार आहे
लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी वारंवार होत होती. भाजप नेत्यांनी ही मागणी लावून धरली होती. श्रद्धा वालकरची हत्या हा लव्ह जिहादचाच प्रकार असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर राज्यात नवीनच नियुक्त झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा करणार असल्याचे संकेत दिले. त्यानुसार हे प्रकार रोखण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर महिला अत्याचार रोखण्यासाठी नवीन टोल फ्रि क्रमांक शासनाने आणला आहे. हा क्रमांक लवकरच कार्यरत होईल.