एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ५० आमदारांनी पुकारलेल्या बंडानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आमदारानंतर नगरसेवक आणि खासदारही आता शिंदे गटात सामिल होत आहेत. अशातच आता नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी काही तासातच राजीनामे देत ठाकरे यांना झटका दिला आहे. त्यामुळे शिवसेनेतील गळती थांबायचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसते आहे. (newly elected shiv sena bearers resigns in ratnagiri)
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर लहान कार्यकर्तेही आता एकनाथ शिंदेंना पाठिंबा देताना दिसत आहेत. रत्नागिरीतील जिल्हाप्रमुखांनी आपला पदभार स्विकारण्यास थेट नकार देत उद्धव ठाकरे यांना झटका दिला आहे. त्याशिवाय रत्नागिरी तालुका युवा संघटक वैभव पाटील यांनी काही तासातच आपल्या पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना शिवसैनिकांवर अन्याय झाल्याचा आरोप बंडखोरांनी केला होता. तसेच, भाजपसोबतची नैसर्गिक युती पुढे नेण्याची मागणीही केली होती. यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या ५० आमदारांनी गुवाहटीत आपला मुक्काम ठेवला होता. त्यावेळी वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना भावनिक आवाहन करत परत बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाही आमदाराने परतीचे नाव घेतले नाही.
आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेच्या पहिल्या खासदाराने बंड पुकारला आहे. कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार मंडलिक यांनी शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जावे असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरला होता. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाची दखल घेत मंडलिकांनी शिंदे गटात सहभाग घेतला आहे.
हेही वाचा – बुडत्याला काडीचा आधार, शिंदेसरकारच्या मंत्रिमंडळावर क्लाईड क्रास्टोंचा हल्लाबोल