टेरर फंडिंगप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा ( NIA) आणि सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) गुरुवारी पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या (PFI) देशभरातील मालमत्ता आणि कार्यालयांवर छापेमारी केली आहे. यात महाराष्ट्रातही आता ED, NIA चे धाडसत्र सुरु आहे. या दोन्ही तपास यंत्रणांनी मुंबई, नवी मुंबई, भिवंडी आणि पुण्यातील कोंढवा परिसरात पीआयएफच्या कार्यालयांची सध्या ईडी आणि एनआयएकडून झाडाझडती सुरु आहे.
नवी मुंबईच्या नेरूळ परिसरातील सेक्टर 23 मधील दारावे गावात पीआयएफच्या कार्यालयावर ईडी आणि एनआयएने धाड टाकली. गेल्या सहा तासांपासून ईडी आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून ही छापेमारी सुरु आहे. याप्रकरणी नेरूळमधून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या छापेमारीतून नेमकी काय माहिती समोर येणारे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान मालेगावतही पीएफआय संघटनेच्या एका सदस्यालाही तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. सैफुरहेमान असे या व्यक्तीचे नाव आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरातून पीएफआय संघटनेचे पदाधिकारी कय्याम शेख आणि रझा शेख अशा दोघांना ताब्यात घेण्यात आले. या संघटनेला जो निधी पुरवठा होत होता त्याचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी होता का याचा तपास केला जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नवी मुंबईतील या धाडसत्रात एनआयए, ईडी, एटीएस आण जीएसटी विभागाचे अधिकारी सामील झाल्याची माहिती आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात पीआयएफचे देशातील मुख्यालय आहे, या कार्यालयातून तपास यंत्रणांनी काही साहित्यही जप्त केले आहे.
National Investigation Agency (NIA) is conducting searches at several locations linked to PFI across Maharashtra.
— ANI (@ANI) September 22, 2022
राष्ट्रीय तपास यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या (PFI) देशभरातील मालमत्तांवर छापे टाकले आहेत. यात मध्यप्रदेश, केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणांकडून टेरर फंडिंगप्रकरणी तपास केला जात आहे. या धाडसत्रामुळे तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
एटीएसकडून आज पहाटेपासून हे धाडसत्र सुरु असल्याची माहिती देण्यात आली. आज पहाटेपासून एटीएसकडून औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई परिसरात छापेमारी करण्यात आली. याप्रकरणी मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेडमध्येही चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीएफआय या संघटनेवर देशविघातक कायवाया आणि समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप आहे. आत्तापर्यंत 20 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून पुढील तपासा एटीएस आणि ईडीकडून सुरु आहे.