शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. उरलीसुरली शिवसेना आणि उरलेले १५ आमदारसुद्धा उद्धव ठाकरे वाचवू शकणार नाहीत. त्यांच्याकडे कोणताही मास्टर प्लान नाही तर उद्धव ठाकरे बोगस माणूस असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. यामध्ये आता आजी-माजी खासदारसुद्धा उघड उघड टीका करताना दिसत आहेत.
भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोगस म्हटलं आहे. तसेच उरलेली शिवसेना वाचवण्यासाठी ठाकरेंकडे कोणताही प्लान नाही. ते उरलेले १५ आमदारसुद्धा वाचवू शकत नाहीत अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. निलेश राणे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंची सेना ही रसातळाला जाणार आहे. त्यांना आता कोणीही वाचवू शकणार नाही. त्यांचे भविष्य ठरलं आहे. ते उद्ध्वस्त होणार, आज बाळासाहेबांचा पक्ष १५ आमदारांचा करण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते १५ आमदारपण राहतील का नाही याची शंका आहे. कसलाही प्लान उद्धव ठाकरे यांच्याकडे नसतो. बोगस माणूस आहेत अशा माणसाकडून कसला मास्टर प्लान, आहेत तेच वाचवण्याची धडपड उद्धव ठाकरेंची सुरु आहे. त्याच्या पलीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे काय काम आहे’. असे वक्तव्य निलेश राणे यांनी केलं आहे.
माजी खासदार निलेश राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. निलेश राणे यांची खासदारकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडून निलेश राणे यांना संधी मिळू शकते. याच संधीसाठी निलेश राणे आता तयारीला लागले आहेत. खासदार विनायक राऊत यांच्यावरसुद्धा निलेश राणे टीका करत असतात. विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. निलेश राणे टीका करुन राजकारणात आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुकीमध्ये निलेश राणे यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेला मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : स्पिकर असतानाही मोदींनी नागरिकांशी माईक न घेता साधला थेट संवाद, कारण…