मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणावरून सिंधुदुर्गातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आहेत. त्यातच नितेश राणे गेल्या पाच दिवसांपासून गायब असून, त्यांच्या फोनही नॉटरिचेबल येत आहे. पोलिसांची अनेक पथके त्यांचा तपास करीत आहे.
दुसरीकडे गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारीच नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो लावण्यात आला असून, ते हरवले आहेत, असं लिहिलंय. तसेच त्यांना शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल, असंही लिहिलंय. त्यामुळे राणेंना एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
विशेष म्हणजे नितेश राणे गायब असतानाच राणे कुटुंबीयांना डिवचणारी बॅनरबाजी गिरगावात करण्यात आलीय. या बॅनरवर नितेश राणे चक्क गायब असल्याचं लिहिण्यात आलंय. नितेश राणे हरवले असून त्यांना शोधून देणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस दिली जाईल, असेदेखील या बॅनरवर लिहिलंय.
दुसरीकडे नितेश राणेंचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर त्यांचे वकील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. सिंधुदुर्ग न्यायालयाने दिलेल्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी सांगितले होते. न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळताना मोबाईल फोन जप्त करण्यासाठी कस्टडीची गरज असणार आहे, असे प्राथमिक कारण दिले होते. मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी या आदेशाला आव्हान दिले तरीही प्रत्यक्षात या प्रकरणातील सुनावणीसाठी सोमवार किंवा मंगळवार उजाडेल, असेही वकिलांनी स्पष्ट केले. त्यामुळे शुक्रवारी याचिका दाखल झाली तरीही फाईल केली तरीही याचिका बोर्डावर यायला दोन दिवस जातील, असेही ते म्हणाले.
पोलिसांपासून बाजूला राहण्याचे नितेश राणेंना पूर्ण अधिकार आहेत. आतापर्यंत नितेश राणेंनी तपासासाठी पूर्ण सहकार्य केलेय. याआधी २५ डिसेंबरलाही नितेश राणे यांनी आपला जबाब नोंदवल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाने दिलेल्या निकालात मोबाईल जप्त करून कस्टडीची मागणी केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेनंतर या प्रकरणात योग्य निर्णय अपेक्षित असल्याचंही त्यांनी अधोरेखित केले.