मुंबईः दिशा सालियान प्रकरणात काही अटी, शर्थींसह आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने आज मंजूर केलाय. त्यानंतर पत्रकार परिषद घेत नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. आज कोर्टानं निर्णय दिलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो, जिथे जिथे अन्याय होत असेल, त्याविरोधात आवाज उठवण्याचं काम आम्ही करणार आहोत, असंही नितेश राणे म्हणालेत.
आताच दिंडोशी सेशन्स कोर्टाने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मला आम्हाला दोघांनाही दिशा सालियानच्या प्रकरणात बेल जाहीर केलेला आहे. तो बेल काही अटी-शर्थीचा आहे. फायनल ऑर्डर अजून माझ्या हातात यायची आहे. जे काही ऐकलेलं आहे, ज्या काही अटी-शर्थी टाकलेल्या आहेत, त्याच्याबरोबर तो बेल दिलेला आहे. मी न्यायालयाचे आभार मानेन, त्यांनी लोकशाहीमध्ये आम्हा लोकप्रतिनिधींना दिलेले जे अधिकार आहेत ते अबाधित ठेवलेत. एक केंद्रीय मंत्री आहेत, दुसरे आमदार आहेत. कोणावरही अन्याय होत असेल तर त्याच्याविरोधात आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार दिला आहे. त्या व्यक्तीला न्याय मिळवून देणं हा जो आम्हाला अधिकार दिलाय. त्या अधिकाराला अबाधित ठेवण्याचं काम आज न्यायालयानं केलेलं आहे, असंही नितेश राणेंनी सांगितलंय.
महाविकास आघाडी सरकारनं जे काही षडयंत्र आमच्याविरोधात रचलं, जो काही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, दिशा सालियानच्या आई-वडिलांवर जो काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असं आम्ही ऐकतोय. त्या दिवशी महापौरताई त्यांच्या घरी गेल्या आणि त्यानंतर ज्या काही हालचाली झाल्या. त्यानंतर आज कोर्टानं निर्णय दिलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो, जिथे जिथे अन्याय होत असेल, त्याविरोधात आवाज उठवण्याचं काम आम्ही करणार आहोत, असंही नितेश राणे म्हणालेत.
अखेर दिंडोशी न्यायालयाकडून राणे पिता-पुत्रांना जामीन मंजूर
दिशा सालियन प्रकरणात केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने अर्जावर सुनावणी करून निर्णय राखून ठेवला होता. बुधवारी अखेर दिंडोशी न्यायालयाने निर्णय दिला असून, नितेश राणे आणि नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.