भाजपचे आमदार नितेश राणे हे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून नेहमी आक्रमक असल्याचं आपण पाहिलं आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते थेटपणे एखाद्या समाजावर बोलणे टाळत होते. पण, आता सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर नितेश राणे यांनी भर दिला आहे. यावेळी ‘ईव्हीएम’वर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना नितेश राणे यांनी ‘ईव्हीएम’चा वेगळाच अर्थ सांगितला आहे. तसेच, यावेळी नितेश राणे यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनाही टोला लगावला आहे.
‘ईव्हीएम’ म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मोहल्ला, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच, मी फाटक्या तोंडाचा आहे. त्यामुळे माझ्या भाषणापूर्वीच विशाल पाटील निघून गेले, असं म्हणत नितेश राणे यांनी फटकेबाजी केली आहे. सांगलीत हिंदू गर्जना सभेत नितेश राणे बोलत होते.
हेही वाचा : “चंद्रपूर हा वाघ अन् ‘वारां’चा जिल्हा, आम्ही हेडगेवारांचे अनुयायी, त्यामुळे…”, ‘CM’फडणवीसांची फटकेबाजी
नितेश राणे म्हणाले, “विरोध ‘ईव्हीएम’च्या नावाने बोंबलतात, ‘ईव्हीएम’ला दोष देतात. मात्र, विधानसभेला आम्ही ‘ईव्हीएम’वरच निवडून आलोय. ‘ईव्हीएम’ म्हणजे एव्हरी व्होट्स अगेन्स्ट मोहल्ला.”
“ज्याने भगवाधारी सरकार आणलं, त्यांचं संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात हिंदुत्त्ववादी सरकार आहे. आम्हालाही विशाळगडावर 12 तारखेला उरूस कसा होतो, हे बघायचं आहे,” असं म्हणत नितेश राणे यांनी 12 जानेवारीला विशाळगडावर उरूस होऊ देणार नसल्याचं सांगितलं आहे.
“सांगलीत दोन कत्तलखाने सुरू आहेत, ते कसे सुरू आहेत, हे खासदार विशाल पाटील यांनी सांगणे गरजेचे होते. पण, मी फाटक्या तोंडाचा आहे, हे त्यांना माहिती होते. त्यामुळे माझ्या भाषणापूर्वीच ते येथील कार्यक्रमातून निघून गेले,” असं म्हणत नितेश राणे यांनी खासदार पाटील यांना लक्ष्य केले.
“जो नियम हिंदूंना लागू होतो, तो इतर धर्माला देखील लागला पाहिजे. आता सरकार हिंदुत्त्ववादी आहे, आता कोणाचे लाड चालणार नाही,” असं नितेश राणे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
“12 तारखेला विशाळगडावर उरूस काढण्याचं नियोजन आहे. विशाळगडावर काय घडलंय, हे सर्वांना माहिती आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट केली. मात्र, हिंदू समाजाच्या एकंदरीत इच्छेनुसार 12 तारखेला कोणीही विशाळगडावर कायदा आणि सुव्यवस्था खराब करण्याचं काम करू नये. हिंदू समाजानं संयमानं घेतलं आहे. अन्य समाजानेही संयमाने घ्यावे. उरूस काढून कोणालाही चिथावण्याचा प्रकार करू नये. शासन म्हणून आम्ही या घटनांवर लक्ष ठेऊन आहोत,” असं नितेश राणे यांनी म्हटलं.
हेही वाचा : वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, ‘सीआयडी’ला ‘ती’ रेकॉर्डिंग सापडली; आता…