मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवक हे शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे शिवसेनेची गळती रोखण्यासाठी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेची सुरूवात केली आहे. काल शिंदे गटातून वरूण सरदेसाई यांची युवासेना अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली.दरम्यान, रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले, अशी खोचक टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले. तरी आदित्य सेना म्हणते आम्ही करून दाखवले, असं ट्विट नितेश राणेंनी करत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले.. तरी आदित्य सेना म्हणते आम्ही करून दाखवले…. pic.twitter.com/0ZWmSyHydf
— nitesh rane (@NiteshNRane) July 20, 2022
मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठींबा दिल्यानंतर बोलताना ही टीका केली. घोटाळे आणि लफडी तुम्ही केली आणि त्यापासून वाचण्यासाठी पक्षप्रमुखांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, असंआदित्य ठाकरे म्हणाले.
उद्यापासून एक महत्त्वाची केस सुरू होत आहे. ही केस नुसती शिवसेनेसाठी नाही तर देशासाठी महत्त्वाची असणार आहे. कारण देशात लोकशाही आहे की नाही किंवा टीकणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, असही आदित्य ठाकरे म्हणाले होते. दरम्यान, शिवसेना आणि युवासेना यांच्यात गळती जरी सुरू असली तरी आदित्य ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत. परंतु नितेश राणेंच्या या ट्विटवर आदित्य ठाकरे पलटवार करतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा : शिंदे गटातील अपात्र आमदारांवर तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी