माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि गृहराज्य मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामधील वाद काही नवे नाहीत. २०१४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी दरम्यान सुरू झालेला राणे – केसरकर यांच्यामधील वाद आता विकोपाला गेला आहे. नुकतेच चिपी विमानतळावर विमानाने केलेल्या उड्डाणावरून देखील ऐन गणपतीमध्ये कोकणात राजकीय शिमगा पाहायला मिळाला होता. मात्र आता केसरकर – राणे यांच्यातील हा वाद एवढ्यावरच राहिला नसून, राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी थेट केसरकर यांच्याविरोधात पुढील अधिवेशनात हक्कभंग आणणार असल्याचे सुतोवाच केले आहे. आज ट्विट करुन नितेश राणे याबद्दल भाष्य केले आहे.
काय म्हणाले नितेश राणे ट्विटमध्ये
एका बाजूला राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याची माहिती केंद्रीय वित्त समितीने दिली आहे. दुसऱ्या बाजूला दीपक केसरकर सिंधुदुर्गात १४०० कोटी आणले आहेत, अशी बोंब मारत फिरत आहेत. कुणाचा बारसा असला तरी तिथे २ कोटी जाहीर करतात. खोटारड्या केसरकरवर या अधिवेशनात हक्कभंग आणणार, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
एका बाजूला राज्याची आर्थिक घडी विसकटल्याची माहिती केंद्रीय वित्त समिती नी दिले
आणि दुसऱ्या बाजुला वित्त राज्य मंत्री दीपक केसरकर सिंधदुर्गात 1400 कोटी आणले आहेत अशी बोंब मारत फिरतात..
कोणाचा बारसा असला तरी तिथे 2 कोटी जाहीर करतात!
खोटारड्या केसरकर वर या अधिवेशनात हक्कभंग आणणार!— nitesh rane (@NiteshNRane) September 17, 2018
याआधी राणेंनी केला होता केसरकरांवर आरोप
चिपी विमानतळावर चेन्नईहून उड्डाण केलेले विमान सकाळी उतरले होते. चेन्नईवरुन उड्डाण केलेले विमान गोवा एअर क्लिअरन्स मिळाल्यानंतर चिपी विमानतळावर लँड झाले. या १२ आसनी विमानातून गणपती बाप्पाचे आगमन झाले. चाचणीसाठी हे विमान उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, डीजीसीएची परवानगी नसताना हे विमान कसे उतरवण्यात आले? असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला होता. दरम्यान याच वेळी दीपक केसरकर यांनी राणेंचा हा आरोप फेटाळला होता. डीजीसीएने परवानगी दिल्यानंतरच हे विमान उतरवल्याचा दावा केसरकर यांनी केला होता.