केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रथमच मुंबई- गोवा महामार्गाचे ड्रोन व्ह्यू फोटो शेअर केले आहेत. त्यांनी या महामार्गाची गुरुवारी पाहणी केली. तसेच, या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्य़ा प्रगतीचा अधिका-यांकडून आढावा घेतला. अपूर्ण राहिलेल्या कामांसंदर्भात अधिका-यांना सूचना केल्या. हे काम पूर्ण झाल्यास गोव्याला सुसाट प्रवास करता येणार आहे. सध्या 586 किमीच्या या मार्गावरुन जाण्यासाठी 11तासांचा कालावधई लागतो.
या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. मुंबई- गोवा महामार्गाने महाराष्ट्रातील कोकणमधील 66 पर्यटन स्थळांना स्पर्श केला आहे. यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. तसेच, फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूकही करणे सोपे होणार असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
महामार्गांवर उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे. रायगड जिल्हा विकासाकडे जाणारा जिल्हा आहे. तसेच कोकणातील सर्व खासदार, मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी मिळून कोकणच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घ्यावा. सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा, शासन, लोकसहभाग आणि खाजगी संस्था अशा एकत्रित गुंतवणुकीतून कोकणातील अनेक विकास कामे होऊ शकतात, असे आवाहन करून येथील जलशक्तीचा वापर करून पर्यटन आणि दळणवळणाच्या उद्देशाने लांबच लांब समुद्रकिनारा लाभलेल्या कोकण प्रदेशासाठी सी प्लेन, हॉवरक्राफ्ट आणि वॉटर टॅक्सी सिस्टिमच्या व्यवहार्यतेचा महाराष्ट्र राज्याने अभ्यास करावा. या पर्यायांना लवकरात लवकर प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करायला हवे, त्यासाठी माझ्याकडूनही सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल. त्यातून आपल्या देशाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या या कोकणचा पर्यटन व औद्योगिक दृष्टीने निश्चितच विकास होईल. यामुळे स्थानिक युवकाला रोजगार मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची आज पाहणी केली. या प्रकल्पाची एकूण १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे.#PragatiKaHighway #GatiShakti #MumbaiGoaHighway pic.twitter.com/snQNMAPZ36
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 30, 2023
( हेही वाचा: शाहीनबाग चालतं? हिंदू रस्त्यावर उतरले की त्रास होतो; हा कोणता न्याय? सर्वोच्च न्यायालयाच्या मतावर मनसेचे सवाल )
या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांची समयोचित भाषणे झाली. या सर्वच मान्यवरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कामाप्रति असलेली निष्ठा सर्वांनीच आदर्श घ्यावा, अशी असल्याचे मत व्यक्त करून मुंबई-गोवा महामार्गाचे काम त्यांनी जिद्दीने हाती घेतल्याबाबत त्यांचे आभार व्यक्त केले.