समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि सेवाकारण हे राजकारण असतं. परंतु सध्या जे सुरू आहे, ते सत्ताकारण आहे, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नितीन गडकरींनी याआधीही अशीच विधान केलेली आहेत. गडकरी हे नेहमी त्यांच्या रोखठोक उत्तरांसाठी आणि चोख कामांसाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं आहे.(Nitin Gadkari define the concept of Politics and said that this is real politics)
गडकरी म्हणाले की, कोरोना काळात आम्ही पैसे गोळा करुन अन्नधान्य आणि किराणा माल आदिवासी भाग आणि मेळघाटात देण्याचं काम केलं. आपला परिसर, आपला विकास या मोहिमेअंतर्गत अतिदुर्गम भागातील 5 तरुणांची निवड केली. त्यांना स्कॉलरशिपसह 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार असल्याचीही माहिती, त्यांनी दिली आहे.
आदिवासी तरुण-तरुणींना मदत
आदिवासी भागातील पहिल्या क्रमांकाने उत्तीरण झालेल्या 64 मुलं आणि 53 मुलींना नागपुरात शिक्षणासाठी आणलं आहे. यातील मुली नंदनवन येथील हिंदू मुलींच्या शाळेत 5 ते 12 च्या वर्गात शिक्षण घेत आहेत. यातील मुलींना खासदार क्रीडा स्पर्धेत बक्षीस मिळालं आहे. तर, अंजनगाव- सुर्जी येथील 115 तरुणी-तरुणींनाही मदत करत आहोत, असं नितीन गडकरींनी म्हटलं.
हे केवळ सत्ताकारण
मी सगळ्या खासदार, आमदार, जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांना सतत आवाहन करतो की, हेच राजकारण आहे. समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण, सेवाकारण हे राजकारण आहे. सध्या जे सुरू आहे, ते सत्ताकारण आहे. सत्ताकारण नक्की करावं. पण, सेवाकारण आणि विकासकारण केल्यावर सामाजिक, आर्थिक परिवर्तन होईल, असंही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
(हेही वाचा: महाराष्ट्राला अजित पवार रिर्टन्स पार्ट-2 पहायला मिळेल, काँग्रेसचा दावा )