राज्यात एकीकडे कोरोना विषाणूने डोके वर काढले असतानाच दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपिटीचे नवे संकट राज्यासमोर उभे राहिले आहे. ऐन उन्हाळ्य़ात बहरलेल्या बागांचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठे नुकसान केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने व गारपिठीने कहर केला असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगरसह अनेक भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे ऐन काढणीला आलेले गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, भूईमूग, द्राक्षे, आंबा, काजू अशा अनेक फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोकणातही अनेक भागात अवकाळी पावसाने ऐन काढणीच्या मोक्यावर आंबा फळाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करत मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.
पुण्यातील वेल्हे तालुक्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली तसेच किल्ले राजगड, तोरणा परिसरालाही अवकाळी पावसाने झोडपले. नगर जिल्हातील राहुरी तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेय अचानक बरसलेल्या या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.
सातारा जिल्ह्यातील वाठार पिंपोडे बुद्रुक, माण तालुक्यातील काही भागात बुधवारी गारपिटीने रस्तावर बर्फाचे थर जमा झाले होते. या गारपिटीने राज्यातील आंबा, काजू, कलिंगड, कांदा, तरकारी पिकांचे प्रचंड नुकसान
झाले. त्यामुळे कोरोनामुळे आधीच बेजार झालेला शेतकरी अवकाळी पावसाने पुरता कोलमडून गेला आहे.