मुंबईः धानाच्या संदर्भात भाजपनं दिलेल्या निवेदनावरून अजित पवारांनी विरोधकांची चांगलीच गोची केलीय. निवेदनात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांनी डबल सह्या केल्याचं सांगत त्यांनी भाजपवर शरसंधान साधलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सभागृहात अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर चांगलीच आगपाखड केलीय. तसेच त्यांनी ज्या दिवशी जन्माला आलो, तेव्हापासून आजपर्यंत दारूच्या एका थेंबाला स्पर्श केला नसल्याचंही सांगितलंय.
भाजपच्या धानाच्या निवेदनावर ते म्हणाले, या सह्या करतानाची गंमत दाखवतो. एका पानावर राधाकृष्ण विखे पाटलांची सही आहे. दादाजी केचे यांची सही आहे. श्वेताताई महालेंची सही आहे. पुढे गेला तर राधाकृष्ण विखे पाटलांची सही आहे. दादाराव केचेंची पुन्हा सही आहे. आणि पुन्हा श्वेता महालेंची सही आहे. (अजितदादा वाचत असतानाच दोन निवेदने असतील अशी ओरड विरोधकांनी सुरू केली.) नाही बाबा दोन कॉप्या नाहीत. मी बारकाईने गिरीशजी बघितलं. नाही साहेब… हे बघा जे चुकलं ते चुकलं. डबल डबल सह्या करून आकडा वाढवण्याचा प्रयत्न केला. मी आता दाखवतो ना. त्यात विशेष काही नाही, असं म्हणत भाजपवर हल्ला चढवलाय.
आजपर्यंत दारूच्या एका थेंबाला स्पर्श केला नाही- अजित पवार
मद्यावरील कर ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून टीका केली गेली. यावर कर कमी केल्यामुळे उलट उत्पन्न वाढल्याचं यावेळी अजित पवारांनी सांगितलंय. तसेच ज्या दिवशी जन्माला आलो, तेव्हापासून आजपर्यंत दारूच्या एका थेंबाला स्पर्श केला नाही हे सगळ्यांना माहिती आहे. राज्याच्या उत्पन्नाचा विचारही करावा लागतो”, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. गेल्या अनेक वर्षांत मी अनुभव घेतलाय. एखादा पेताड असला, तरी तो कुठल्याही गावात असू द्या, आपल्याला त्या गावातली दारूची दुकानं माहिती नसतात. तरी ते पेंगतच येतंय रात्री. त्याला विचारलं कसं रे? तर म्हणतो आलो जाऊन, असं म्हणत त्यांनी टोलेबाजी केलीय.
हेही वाचाः मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण! प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला