कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यात कठोर निर्बंध लावले जाणार की लॉकडाऊन लागू करणार, यावर चर्चा सुरू आहे. पण यादरम्यान राज्यात संपूर्ण लॉकडाऊन नाही पण मिनी लॉकडाऊन लागणार अशी माहिती उद्योगपती हर्ष गोयंका यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर हर्ष गोयंका यांनी राज्यातील लॉकडाऊनबाबत ट्विट केलं आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या उद्योगपतींसोबत चर्चा केली. उद्योग बंद करायचे नाही आहे, लॉकडाऊन लावायचा नाही आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. परंतु काही कडक निर्बंध लावावे लागतील, त्यावेळी मात्र उद्योग क्षेत्रातील उद्योगपतींनी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. जर उद्योग, कारखाने सुरू ठेवणार असेल तर कामगारांचे लसीकरण केले पाहिजे. तसेच त्यांचे विलगीकरण करून कोरोनाबद्दल काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशा प्रकारे बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे.
उद्योगपतींसोबत बैठक झाल्यानंतर हर्ष गोयंका यांनी ट्विट करून सांगितले की, ‘बेड्स, ऑक्सीजन आणि डॉक्टरांच्या कमतरतेमुळे राज्याची स्थिती गंभीर बनली आहे. लॉकडाऊन नसेल पण मिनी लॉकडाऊन हा शेवटा पर्याय असेल. लसीकरण २४ तास सुरू राहणार आहे. मास्क नसेल तर कठोर दंड ठोठावला जाईल. मजुरांची आणि कर्मचारी वर्गाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.’
Covid meeting with CM Thackeray today:
– Maharashtra situation getting grim with possible shortage of beds, oxygen and doctors
– Not in favour of lockdown but a limited lockdown maybe last resort
– Vaccination drive 24×7
– Masks a must or penalty
– Workers not be inconvenienced pic.twitter.com/ytKQ6icEqI— Harsh Goenka (@hvgoenka) April 4, 2021
दरम्यान जिन्दल समूहाने ऑक्सीजनच्या पुरवठ्यासाठी शासनाला सहकार्याची भूमिका दाखवली आहे. तर बाबा कल्याणी यांनी व्हेंटिलेटर आणि त्याच्या प्रशिक्षणासाठी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या काळात सरकारला मदत करण्यासाठी उद्योग जगतातील लोकं पुढे सरकारवून येत असल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा – राज्यात कोरोनाचा संसर्ग नसल्यामुळे मास्क घालण्याची गरज नाही, भाजप आरोग्यमंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य