बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याची शक्यता फेटाळून लावत त्याने आत्महत्या केली असल्याचा अहवाल दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयाने CBI कडे दिला आहे. यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयवर टीका करण्याची संधी साधली. “सीबीआयकडून महाराष्ट्र पोलिसांना अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. एम्सच्या अहवालानंतर तरी सीबीआयने आता आपला अहवाल सादर करावा, जेणेकरुन सत्य लोकांसमोर येईल”, अशा शब्दात देशमुख यांनी सीबीआयला कोंडीत पकडले आहे.
सुशांत सिंग राजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी १४ जून रोजी आत्महत्या केली होती. मुंबई पोलिसांनी त्यादृष्टीने आपला तपास सुरु केला होता. मात्र विरोधकांनी रजाकारण केल्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपविले, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. तर आता साडे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर एम्सने दिलेला आत्महत्येच्या अहवालाला अंतिम मानन्यात येत आहे. यामुळे यापुढे या प्रकरणात आणखी काही ट्विस्ट येईल का? याबाबत साशंकता आहे. हाच धागा पकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने आतातरी सत्य लोकांना सांगावे, असे आवाहन केले आहे.
हत्या नसून आत्महत्या AIIMS चा दावा
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली होती असा आरोप काही लोकांकडून केला जात होता. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस तपास करत नसल्याचेही सुरुवातीला बोलले जात होते. मात्र आता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या फॉरेन्सिक टीमने आपला अहवाला सीबीआयच्या हवाली केला आहे. त्यामध्ये त्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.