Maharashtra Winter Session 2022 | नागपूर – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दोन आठवड्यात चर्चा होऊ न शकलेल्या मुद्द्यांवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सभागृहात हजर नसल्याने विरोधकांनी (Opposition Leaders) संताप व्यक्त केला आहे. तसंच, मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही (Assembly Chairmen Rahul Narvekar) मंत्र्यांना फटकारले आहे.
हेही वाचा – अजित पवारांना माहीत नसणं तांत्रिक बाब, अविश्वास प्रस्तावावरून संजय राऊतांची सारवासारव
आज सकाळी ११ वाजता प्रश्नोत्तरे सत्राला सुरुवात झाली. अल्पसूचना प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणे नियोजित होते. राज्यात पसरलेल्या गोवर या आजाराबाबत हा प्रश्न उपस्थित करण्यात येणार होता. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर येणे अपेक्षित होते. मात्र, प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात हजर न राहिल्याने हा प्रश्न राखून ठेवण्यात आला आहे. यावरून आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत असतानाही मुख्यमंत्री सभागृहात हजर न राहिल्याने सभागृहात विरोधकांनी गोंधळ केला. त्यामुळे मंत्र्यांना समज देण्याची मागणी विरोधकांनी अध्यक्षांना केली.
“काल आम्ही साडेअकरा वाजेपर्यंत सभागृहात होतो. आज सकाळी नऊ वाजता आलो आहोत,” असं सांगून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली. “नियोजित कार्यक्रमानुसार प्रश्नोत्तरे तास, अल्पसूचना प्रश्न असा क्रम आहे. तरीही शंभूराज देसाई पांघरूण घालण्याचं काम करत आहेत,” असं अजित पवार म्हणाले. “काही मंत्री सरळ सांगतात की पुढच्या अधिवेशनात लक्षवेधी घेऊ असं सांगतात, हे बरोबर नाही. आमचं काही योग्य नसेल तर आम्हाला सांगा. पण त्यांचं काही चुकत असेल तर त्यांच्याविरोधातही आसूड हातात घ्या ना,” असा संताप अजित पवारांनी (Opposition Leader Ajit Pawar) व्यक्त केला.
हेही वाचा – हीराबेन मोदी अनंतात विलीन, पंतप्रधान मोदींनी दिला मुखाग्नी
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण
“या संपूर्ण अधिवेशनात जेवढ्या जास्त घेता येतील तेवढ्या जास्त लक्षवेधी घेतल्या. सभागृहाकडून योग्य सहकार्य प्राप्त झालं आहे. शासनाकडून जास्तीत जास्त लक्षवेधी घेतल्यामुळे जास्तीत जास्त उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला. काही मंत्री वरच्या सभागृहात असतील किंवा काही लक्षवेधी उशिरा पोहोचल्याने त्याची उत्तरे मिळाली नसल्याने पुढे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. पण जास्तीत जास्त लक्षवेधी घेतली आहेत. उर्वरित लक्षवेधींना आज घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जर लक्षवेधी उरल्या तर दालनात बैठक घेऊन त्यावर निर्णय आपण घेऊ,” असं राहुल नार्वेकर म्हणाले.
हेही वाचा – मविआच्या नेत्यांकडून अविश्वास प्रस्ताव, पण अजित पवार अनभिज्ञ; नेमकं प्रकरण काय?
अध्यक्षांनी फटकारले
प्रश्नोत्तराच्या वेळेला मंत्री उपस्थित नसतील तर मंत्र्यांनी नोंद घ्यावी. मंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित नसणे हे अपेक्षित नाही आणि ते स्वीकारलंही जाणार नाही, असंही राहुल नार्वेकर पुढे म्हणाले.
गिरीश महाजन अनुपस्थित, पवार संतापले
आज गिरीश महाजनही लक्षवेधी सत्रांत गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या खात्यातील प्रश्न राखीव ठेवण्यात आला आहे. यावरून अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘किती दिवस प्रश्न पुढे ढकलणार. आम्हीही मंत्री होतो. मंत्र्यांचं काम असतं येथे यायचं. मंत्री नाही तर त्यांना जाब कोण विचारणार. पण गिरीश महाजन का नाही आले, सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात. अरे पुढच्या अधिवेशनात कोण राहतंय कोण जातंय काय माहित. तुम्हीही काही बोलत नाही. सगळ्यांचे लाड चालले आहेत,’ असं अजित पवार म्हणाले.