मुंबई : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघातावरून (Odisha Train Accident) विरोधक आक्रमक झाले आहेत. रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळेच अपघात झाला असल्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तर, भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शरसंधान केले आहे.
हेही वाचा – Sharad Pawar : रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी, सत्यता समोर येईल – पवार
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या शनिवारी 288 झाली, तर जखमींचा आकडा 900वर जाऊन पोहचला आहे. आतापर्यंतच्या भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात मानला जात असून ओडिशातील या मृत्यूतांडवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांपासून सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे.
पण त्याचबरोबर या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांची आहे. या रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी, जेणेकरून सत्यता समोर येईल आणि त्यानंतर पुढील काही गोष्टी सुचवता येतील, असे सांगतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री असताना घडलेल्या रेल्वे अपघाताचा दाखला देत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
The one who as CM never left his home and despite being responsible for lakhs of death in his own state due to covid was never asked to RESIGN!
But the one who has been on field ever since the railway accident happened is asked to RESIGN !!! pic.twitter.com/8spQb47ExC— nitesh rane (@NiteshNRane) June 4, 2023
यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट कर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ज्या व्यक्तीने मुख्यमंत्री असताना कधीही घर सोडले नाही आणि कोविडमुळे आपल्याच राज्यात लाखो मृत्यूंना जबाबदार असूनही त्यांनी कधीही राजीनामा देण्यास सांगितले गेले नाही! पण रेल्वे अपघात झाल्यापासून जी व्यक्ती घटनास्थळावर आहे, त्या व्यक्तीला राजीनामा देण्यास सांगितले जाते, असा टोला नितेश राणे यांनी ट्विटरवरून लगावला आहे.
पवार साहेब म्हणतात जी रेल दुर्घटना ओडिशात घडली त्यावर रेल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा,
पवार साहेब हाच जर निकष असेल तर आपण कृषी मंत्री असताना हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आपण तर राजकारणातून कधीच संन्यास घ्यायला हवा होता.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 4, 2023
शरद पवार यांनी ओडिशा दुर्घटनेप्रकरणी रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. पण हाच जर निकष असेल तर, आपण कृषीमंत्री असताना हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आपण तर राजकारणातून कधीच संन्यास घ्यायला हवा होता, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.