गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होत आहे. विशेषत: महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सातत्याने अवहेलना होत आहे. अशातच आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अंगात भूत संचारल्याचे पाहायला मिळते, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील काही भागावर दावा केल्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सांगलीतल्या जत तालुक्यातील ४० गावांवर कर्नाटक सरकारने दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (on maharashtra border issue shivsena uddhav thackeray slams karnataka cm basavraj bommai)
“गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होत आहे. विशेषत: महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सातत्याने अवहेलना होत आहे. अशातच आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अंगात भूत संचारल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रात माणसं राहत नाहीत. महाराष्ट्राला अस्मिता, धमक, हिंमत आणि शक्ती काहीच नाहीये. कोणी यावे टपली मारावी. आतापर्यंत फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून नुसतंच गपं बसायचं हे आता खूप झालं. महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच. पण त्यांचा अपमान झाल्यानंतर मुळमूळीत प्रतिक्रिया दिल्या जात असल्याचे पाहायला मिळतंय. ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षाकडून या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत”
“काही दिवसांपासून देशामध्ये काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची गरज होती आणि त्या विषयांवर आता चर्चा होतेय. त्याच विषयांमधील तिसरा विषय मी मांडत आहे. आपल्या देशाच्या कायदेमंत्र्यांनी देशाच्या न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नेमणुकीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही न्यायमूर्तींच्या नेमणुकीची पद्धत ही आपारदर्शक असल्याचे त्यांचे मत आहे. तसेच, त्या नेमणुकीचे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असायला पाहिजे असे त्यांनी म्हटले”
“महाराष्ट्रातील सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाही हे कळत नाही. कारण मुख्यमंत्री कधी बोलतच नाहीत. महाराष्ट्रातल्या गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगत आहेत. आज महाराष्ट्रात ईडी सरकार किंवा खोके सरकार किंवा मिंधे सरकार आहे. या सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाही कळतच नाही. कारण मुख्यमंत्री काही बोलतच नाहीत. त्यांना काही विचारलं तर ते सांगतील ‘काळजी करू नका. मी पंतप्रधानांना सांगितलं आहे. ते म्हणाले की त्यांनी ४० गावं घेतली तर घेऊ द्या. आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर महाराष्ट्राला १०० गावं देऊ’ असंही ते कदाचित सांगू शकतील. त्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीच आहे. उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करत आहेत”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“पक्षाचे नेते किंवा राज्याचे मुख्यमंत्री, विशेषत: भाजपाच्या अखत्यारीतले, त्यांच्या वरीष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू-चालू शकतात का? ते नसेल, तर मग बोम्मई जे काही बोललेत, हे त्यांच्या वरीष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? म्हणजे भाजपाचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न, उद्योगधंदे इतरत्र पळवून महाराष्ट्र कंगाल करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे”, अशा शब्दातं उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीकास्र सोडलं.
हेही वाचा – विधानसभेची निवडणूक जवळ आली; सीमाप्रश्नाच्या राजकारणाची वेळ झाली!