19 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यभरात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. मागील दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा नागरिकांमध्ये दहीहंडी जल्लोषात साजरी करण्यात आली. गोविंदा पथकांनी एकावर एक थर रचून दहीहंडी फोडली. दरम्यान, याचंवेळी राज्यभरात एकीकडे दहीहंडी सणाचा उत्साह तर, दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये दहीहंडी पथकातील एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. या मृत गोविंदाचं नाव वसंत लाया चौगले असून त्यांचं नाव 55 वर्ष होतं. दहीहंडी पथकात नाचत असताना वसंत यांना अचानक चक्कर आली आणी ते खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या अवहालानुसार, वसंत यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचं निदान समोर आले.
हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच झाला मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील पाजपंढरी गावात ही वाईट घटना घडली. या गावात तेथील कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, वसंत चौगले हे देखील या उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी ते नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आली आणि ते जागीच कोसळले. त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई-ठाण्यातील 148 गोविंदा जखमी
काल राज्यभरात दहीहंडीचा सण उत्साहात पार पडला. मात्र त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आणि ठाण्यामधून एकूण 148 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 111 गोविंदा मुंबईमधील असून यांपैकी 88 गोविंदांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ठाण्यामध्ये 37 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील 23 गोविंदांवर अजून उपचार सुरू आहेत.