जालन्यातील साष्ट-पिंपळगाव येथील एका मराठा आंदोलनकाची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. आज पहाटे आंदोलक बाबासाहेब वैद्य यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून जालन्यातील साष्ट-पिंपळगाव येथे बाबासाहेब वैद्य यांच्यासह चार आंदोलक आमरण उपोषण करत आहेत. याआधी त्यांनी ठिय्या आंदोलन देखील केले आहे. आज आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. पण आता एका आंदोलकाची प्रकृती खालवल्यामुळे सरकार आणि मराठा नेत्यांकडून कोणी आंदोलनकांची समजूत काढणार का? असे प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.
मराठा आरक्षणासाठी आंदोलक आग्रही
गेल्या नऊ दिवसांपासून जालन्यातील मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे आणि मागील तीन दिवसांपासून चार आंदोलकांचे आमरण उपोषण सुरू आहे. यामधील ४५ वर्षांचे आंदोलक बाबासाहेब वैद्य यांना आज पहाटे साडे पाच वाजता अचानक त्रास होऊ लागला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ते बेशुद्ध झाले. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर गावापासून जवळ असलेल्या एका रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. तालुक्याच ठिकाण दूर असून आंदोलन स्थळी तात्काळ उपचार मिळणे फार अवघड आहे. त्यामुळे मराठा आंदोलक जास्त आक्रमक झाले आहेत. आंदोलन स्थळी आरोग्य सेवकांची किंवा डॉक्टरची उपस्थित असावी, अशी मराठा आंदोलकांकडून मागणी केली जात आहे.
दरम्यान मराठा आंदोलकांच्या आरक्षणाच्या मागणीकडे प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहे. पण मराठा आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा करावी. सरकार मराठा आरक्षणाबाबत नेमके ते काय पाऊल उचलत आहे? हे त्यांना कळत नाही आहे. त्यासाठी मराठा आंदोलक त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत.
हेही वाचा – मराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांची नोटीस