मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय बंड हे संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. राज्यात राजकीय घडामोडी सुरू असतानाच शिवसेनेचे बंडखोर आमदार शाहजीबापू पाटील यांचं ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ हे वाक्य संपूर्ण महाराष्ट्रात चांगलंच गाजलंय. परंतु त्या वाक्याचं वेड आता राज्यातील जनतेला लागलेलं दिसून येत आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये काय तो पाऊस, काय ते तुंबलेले पाणी आणि बीएमसी ओकेमध्ये आहे, असं एका तरूणीने म्हटलं आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
काय आहे या व्हिडिओमध्ये ?
सध्या महाराष्ट्रात पावसाचं आगमन झालेलं आहे. तसेच मागील दोन ते तीन दिवसांपासून संपूर्ण राज्यात कोसळधार पावसाला सुरूवात झालेली आहे. मात्र, नेहमीप्रमाणे आणि दरवर्षीप्रमाणे मुंबईची तुंबई झालेल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसून आलं आहे. पावसामुळे रस्त्यावरील पाणी तुंबलं आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पाण्यातून वाट काढावी लागत आहे. एकंदरीत या साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. अशातच एका तरूणीने हा व्हिडिओ शूट केला आहे. तसेच ‘काय तो पाऊस, काय ते तुंबलेले पाणी आणि बीएमसी ओकेमध्ये’ आहे, असं तिनं म्हटलं आहे. या साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं दिसत आहे.
काय तो पाऊस, काय ते तुंबलेले पाणी आणि @mybmc Okay मध्ये एकदम… pic.twitter.com/bUXj8eMNni
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 1, 2022
यापूर्वी देखील आरजे मलिष्काचं मुंबई महानगरपालिकेवरचं गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. मुंबईतील स्थानिक तसेच आपण सर्वजण काहीनाकाही समस्यांना तोंड देत असतो, त्यामुळे मुंबईतील रस्त्यांवरील पडलेल्या खड्यांवर तिनं गाण्याच्या माध्यमातून बीएमसीचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, या व्हिडिओमधून सुद्दा या तरूणीने मुंबई महापालिकेचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतुल भातखळकरांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
हेही वाचा : अमित ठाकरेंचा ७ दिवस कोकण दौरा