जीवघेण्या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. टप्पा टप्प्याने प्रत्येक राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर देशातील १ अब्ज लोकांना लसीचा डोस देण्याचा टप्पा पार झाला. काही राज्यांमध्ये लसीकरणांच्या मोहिमेत १० कोटींचा टप्प्या पार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १२ कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रातील ३६ पैकी फक्त चार जिल्हे वर्षा अखेरीस १०० टक्के पहिला डोस देण्याचे लक्ष्य गाठणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे खरंच राज्यात वेगाने लसीकरण सुरू आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात ८६ टक्के लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे, परंतु २२ जिल्हे सरासरीपेक्षा कमी आहेत. फक्त मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पहिला डोस देण्यात आला आहे. अंदाजे प्रौढ लोकसंख्येच्या १०० टक्के पेक्षा जास्त लोकांना किमान एक डोस देण्यात आला आहे. मुंबईत १०६ टक्के आणि पुण्यात १०३ टक्के पहिला डोस देण्यात आला आहे. कारण या जिल्ह्यांमध्ये बाहेरीव लोक देखील लस घेतात, त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील टक्केवारी १०० पेक्षा अधिक आहे.
दरम्यान भंडारा आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे १०० टक्के पहिला डोस देण्याचे लक्ष्य वर्षा अखेरिस गाठण्याचे शक्यता आहे. या जिल्ह्यात जवळपास ९६ टक्के लोकसंख्येला एक डोस दिला गेला आहे. १०० टक्के पहिला डोस देण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी भंडारा जिल्ह्याला ३७ हजार डोस देण्याची आवश्यकता आहे. तर सिंधुदुर्गला हा टप्पा गाठण्यासाठी पुढील १० दिवसांत आणखीन २६ हजार डोस देणे आवश्यक असणार आहे.
महाराष्ट्रात १२ कोटी ७७ लाखांहून अधिक जणांनी लसीचे डोस घेतले आहेत. यापैकी ७ कोटी ८८ लाखांहून अधिक जणांना पहिला डोस देण्यात आला असून ४ कोटी ८९ लाखांहून अधिक जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
कोविन डॅशबोर्डनुसार,
जिल्हा एकूण लसीकरण
मुंबई १,७४,१३,६८६
पुणे १,४५,६१.४०६
भंडारा १४,९४,६९३
सिंधुदुर्ग ९,६२,४००
हेही वाचा – Omicron Variant : राज्यात ६ नवीन ओमिक्रॉन बाधितांची नोंद, एकूण संख्या ५४ वर