घरताज्या घडामोडीनागपूरचं अधिवेशन हे फक्त औपचारिकताच आहे - देवेंद्र फडणवीस

नागपूरचं अधिवेशन हे फक्त औपचारिकताच आहे – देवेंद्र फडणवीस

Subscribe

राज्य सरकारचं रखडलेलं खातेवाटप आणि शेतकऱ्यांना मदत देण्यात होत असलेल्या विलंबावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

राज्य सरकारकडून सत्तास्थापनेच्या १३ दिवसांनंतर देखील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप रखडलंच असल्यामुळे राज्यातल्या सर्वच स्तरातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच विरोधकांनी मात्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सध्या राज्यात नवे प्रकल्प सुरू करण्याऐवजी जे प्रकल्प आधीपासून सुरू आहेत, ते प्रकल्पच बंद केले जात आहेत. त्यात नागपूरचं अधिवेशन फक्त ५ ते ६ दिवसांचं घेतलं जात आहे. आमची अशी मागणी होती की राज्यासमोर सध्या असलेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन किमान २ आठवडे घेतलं जावं. पण ती मागणी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली नाही. त्यामुळे हे अधिवेशन फक्त औपचारिकताच आहे’, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

‘खातेवाटपच नाही, उत्तरं देणार कोण?’

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या रखडलेल्या खातेवाटपावर उपरोधिक टीका केली. ‘नागपूरचं अधिवेशन हे फक्च ५ ते ६ दिवसांसाठी घेतलं जात आहे. त्यामध्ये प्रश्न वगैरे नसतील. पण आम्हाला असा प्रश्न आहे, की मंत्र्यांना खातेवाटप अद्याप केलं गेलेलं नाही, मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही, मग प्रश्नांना उत्तरं देणार कोण? या सरकारने तात्काळ खातेवाटप करून राज्यातली प्रलंबित कामं तातडीने सुरू करावीत’, असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच, ‘इतके दिवस उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना जी मदत मिळायला हवी, ती मदत अद्याप मिळत नाहीये. त्यासाठी या सरकारला आम्ही पूर्ण मदत करायला तयार आहोत. पुढच्या वर्षी चार कामं कमी करावी लागली, तरी आमची हरकत नाही. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जावी’, असं देखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -