मुंबई – भारतीय जनता पक्षातील नेत्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. बीडमधील भाजपच्या राष्ट्रीय नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यातील शाब्दिक युद्ध आता वरिष्ठांकडे लेखी तक्रार करण्याची धमकी देण्यापर्यंत गेले आहे. पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील वादा आता त्यांच्याकडूनच माध्यमांसमोर मांडला जात आहे. यावर विरोधकांनी त्यांना डिवचलं नाही तरच नवल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या दोन्ही नेत्यांच्या वादावर आता भाजपचे लोक आता एकमेकांचे कपडे फाडणार नाही एवढीच अपेक्षा असल्याचा टोला लगावला आहे.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपचे आमदार हे अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आणि आमदारांविरोधात भिडले होते. नंतर भाजपचे आणि अजित पवारांचेच आमदार त्यांच्या मंत्र्यांविरोधात बोलायला लागले. आता भाजपचे लोक एकमेकांविरोधातच भिडले आहेत. पहिल्या तीन महिन्यात हीस्थिती आहे. पुढील सहा महिने आणि वर्षभरात हे नेमकं काय करतील. चार वर्षात हे कुठपर्यंत जातील सांगता येत नाही. मात्र भाजपचे लोक आता एकमेकांचे कपडे फाडणार नाही एवढीच अपेक्षा असा टोला पवारांनी लगावला.
दरम्यान आज राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ यांनी समज द्यावी, अशी विनंती केली आहे. मी राष्ट्रीय नेता आहे. असे असताना भाजप आमदारांकूडन वैयक्तीक टीका सहन करुन घेणार नाही, असा पवित्रा पंकजा मुंडे यांनी घेतला. तीन महिने गप्प होते, पण आता सहन करणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांच्या पवित्र्यानंतर आमदार सुरेश धस यांनी मी देखील पंकजा मुंडे यांची लेखी तक्रार केंद्रीय नेत्यांकडे करणार असल्याचे म्हटले आहे. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांनी भाजपच्या फक्त एकाच उमेदवाराचा प्रचार केला. आष्टी मतदारसंघात त्यांनी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांचा प्रचार केल्याचा आरोप धसांनी केला. बीड जिल्ह्यातील भाजपच्या या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर होत असलेल्या आरोपांमुळे भाजप हा शिस्तीचा आणि पार्टी विथ डिफरन्स असा पक्ष असल्याचे म्हटले जाते, त्यात मुंडे आणि धसांची वक्तव्य कुठे बसते, अशी चर्चा होत आहे.